उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती
उत्तम आरोग्य असले, की जिवनात सुखसमृद्धी नक्कीच अनुभवता येते. थोडक्यात काय तर, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती..! म्हणून आपल्या आरोग्याबद्दल नेहमीच जागरूक असायला हवे. आजचे आधुनिक युग म्हणजे भौतिक सुखसमृद्धीचे मायावी आवरणच म्हणावे लागेल. नैसर्गिक पद्धतीने जगण्यापेक्षा अनैसर्गिक साधनांचा वापर करूनच जगणे अंगिकारले जात आहे, आणि हेच पुढे धोकेदायक ठरत आहे. जे घटक नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होतात, तेच घटक रासायनिक औषधांमार्फत मिळविले जाते. महिन्याचा किराणा, तसा औषधसाठाही घरात साठवून ठेवला जातो. खरे तर नैसर्गिक पद्धतीने शरीराला लागणाऱ्या घटकांचा वापर वाढावा, हाच प्रयत्न प्रत्येक कुटुंबात असायला हवा..! चला, तर मग सकाळचा नाश्ता, आरोग्यदायी ‘ड’ जिवनसत्वाचे महत्त्व आणि युरीक एसिडपासून बचाव कसा करता येईल. यासंबंधी सविस्तर चर्चा करूया..!
सकाळचा नाश्ता हवाच..!
तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. सकाळचा नाश्ता आवश्यक पोषकतत्त्वासोबत दिवसभर उर्जा देतं. मोड आलेले कडधान्य, गव्हाचा ब्रेड, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, ढोकळा तसेच उपमा, पोहे इत्यांदीचा सकाळच्या नाश्त्यात समावेश असायला हवा. सकाळच्या पोटभर नाश्त्यात साधारणपणे 260 कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता जर पोटभर केला तर त्यानंतर आपण शरीराची हालचाल करणे किंवा आपली दिनचर्या फॉलो करणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असून, वजनही वाढते.
आरोग्यदायी ‘ड’ जीवनसत्व
भारतात ७६ टक्के लोक ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावाने ग्रस्त आहेत. यात १८ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो. चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यास ‘ड’ जीवनसत्त्व शोषून घेण्याची क्षमता वाढते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होणे, हाडांमध्ये वेदना, केसगळती, ऑस्टियोपोरोसिस, रिकेट्स, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह मेलिटस, हृदयरोग, संसर्गजन्य रोग, स्व-प्रतिरक्षित रोग, कर्करोग, संधीवात हे आजार उद्भवतात. ‘ड’ जीवनसत्त्व मिळवण्यासाठी चरबीयुक्त मासे, पनीर, अळंबी, अंडे, दुग्धजन्य उत्पादने, संत्र्याचा रस सोया ज्यूस या पदार्थांचा समावेश असायला हवा. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकातही ‘ड’ जिवनसत्व मुबलक असते. कृष्णवर्णीय, लठ्ठ आणि वृद्ध लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळतो. मूत्रपिंडाचे आणि हृदयाचे आजार असणाऱ्यांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव दिसून येतो.
हानीकारक युरीक ॲसिड
युरीक ॲसिड प्रत्येकाच्या शरीरात असते. ते मूत्रपिंडातून युरीनद्वारे बाहेर पडते. युरीक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. युरीक ॲसिड वाढल्यास मूत्रपिंड आकार्यक्षम बनते. अतिरिक्त वजनामुळे मूत्रपिंडांना त्यांचे कार्य करणे आणि विषारी पदार्थ नष्ट करणे कठीण जाते. तसेच शरीराची सूज वाढून युरीक ॲसिड मोठ्या प्रमाणात निर्माण होते. म्हणून वजन नियंत्रणात असायला हवे. त्याचप्रमाणे आहारावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे. प्रथिनयुक्त, साखरयुक्त पदार्थही शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढवतात. यापेक्षा कमी कार्बोहायड्रेड असलेले पदार्थ जास्तीत आहारात असायला हवेत. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे युरीक ॲसिड नियंत्रणासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायले हवे तसेच जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करायला हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा