‘व्वाह..!’ खाते जावो... पण..!
‘अति तेथे माती’ अशी म्हण फारच प्रचलित आहे. मात्र त्याचे अनुकरण फारसे होताना दिसत नाही. विशेषकरून खाण्याच्या बाबतीत. खातांना किती, केव्हा आणि काय खावे याचं भानच राहत नाही. असे बरेच खाद्यपदार्थ आहेत ज्याचे प्रमाण, केव्हा आणि कसं खावं याची माहितीच नसते. ‘बस खाते जावो, और खिलाने वालो के गुण गाते जावो..! खाताना ‘व्वाह...व्वाह..!’ म्हणत बोटं चाटणारी खवैय्ये भोवताली नक्कीच पाहायला मिळतात. कदाचित त्यात आपणही असाल..! तर आजच सावध व्हा..! चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आपल्याला महागात पडू शकतो. या लेखात अशाच खाद्यपदार्थांवर आपण चर्चा करणार आहोत. फळांचा राजा आंबा...! कधी, केव्हा आणि किती खावा, सकाळी उपाशी पोटी खाता येण्यासारखे खजूर, मनुके, पपई, सबजा केव्हा आणि कसे खावे यावर सविस्तर माहिती करून घेऊया. म्हणजे ‘अति तेथे माती’ असं आपलं होणार नाही. निरोगी राहण्यासाठी खावे, रोगी होण्यासाठी नव्हे..! हे कायम लक्षात असू द्यावे..!
रसाळ आंबा, पण प्रमाणातच..!
आंब्यामध्ये ए, बी-6, बी-12, सी, ई, कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फॅट, मॅग्नेशियम, साखर, प्रथिने ही पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. यात फायबर आणि पाण्याचे प्रमाण असून पाचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठता होत नाही. आंब्यात पाचन एंझाइम्स मुबलक प्रमाणात आहे. आंब्यातील व्हिटॅमिन ‘ए’ मुळे त्वचेचे आरोग्य सुधारते तेसेच मुरुमांशी लढण्यात मदत करते. रक्तदाब सुधारण्यास मदत होते. थायरॉईड संबंधित समस्येने पीडित असलेल्या रुग्णांसाठी मॅग्नेशियम खुपच फायदेशीर आहे. आंबा शक्यतो सूर्योदयानंतर आणि सुर्यास्ता आधीच खावा. रात्री आंबा खाल्ल्यास आमवात वाढतो. आंब्याचे अति सेवन शरीराला घातकही ठरू शकते. तज्ञांच्या मते, दररोज 350 ग्रॅमपेक्षा कमी आंबा खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. जास्त प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढण्याचीही शक्यता वाढते.
पोषक खजूर, मनुके, पपई अन् सबजा
सकाळचा पोषक असला की, संपुर्ण दिवस उत्तम जातो. खजूर, मनुके, सबजा हे सर्व खाद्यपदार्थ रात्री पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपाटी खाणे खुपच पायदेशीर असते. खजूर हे इन्स्टंट एनर्जी फूड आहेत. खजूरमध्ये विरघळणारे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास उपयुक्त मानले जाते. भिजवलेले मनुके खाल्ल्याने पचनाच्या समस्यांवर मात करता येते. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. कर्करोगही टाळता येतो. भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमचा मेटाबॉलिजम वाढतोच शिवाय ऊर्जाही मिळते तसेच पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पपई हे खूप फायदेशीर मानले जाते. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोट साफ होते. सबजा प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, कारण त्यामध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड असतात, जे मॅग्नेशियम, लोह आणि बी-व्हिटॅमिनने भरलेले असतात. सबजा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी घेतल्यास फायदेशीर ठरते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा