आपणही या चुका करतात..?
आपल्या सवयी, वागणे, बोलणे यावर आरोग्य आणि व्यक्तिमत्व अवलंबून असते. आयुष्य जगत असताना साध्या-साध्या गोष्टी असतात ज्या योग्य पद्धतीनेच व्हायला हव्यात. त्या करताना नकळतच चुका होत असतील तर त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. कधीकधी रोजच्या चुकीच्या सवयी कालांतराने शारीरिक, मानसिक हानी पोहचविणाऱ्या असतात. घरापासून तर ऑफिसपर्यंत आपल्या सवयींमध्ये पद्धतशीरपणा असणे गरजेचे आहे. घरातल्या सवयी, वागणे ऑफिसमध्ये आणि ऑफिसच्या सवयी, वागणे घरामध्ये, असे करू नये. निटनेटकेपणा तर असायलाच हवा..! आपण या लेखात आंघोळ करतानाच्या चुका, जेवणाआधी आंघोळ की जेवणानंतर आंघोळ करावी? प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी काय सजगता बाळगावी..! अशाच काही चुकीच्या सवयींवर चर्चा करणार आहोत. ज्याचा गांभिर्याने विचार होऊन त्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.
आंघोळ करताना या चुका टाळा
शरीराच्या सफाईसाठी नियमित अंघोळ करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अंघोळ करण्याचीही पद्धत आहे. अयोग्य पद्धतीने केलेली आंघोळ शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून अंघोळ करताना काही चुका नक्कीच टाळायला हव्यात. जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचेतील नॅच्युरल ऑईल कमी होऊ लागते. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या होऊ शकते. रोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला सुरकुत्या पडू शकतात. अनेक लोक अंघोळ करतेवेळी शेविंग करतात. परंतु गडबडीत त्वचेला रेजरमुळे जखमही होऊ शकते. अंग पुसताना टॉवेल शरीरावर रगडण्याच्या सवयीमुळे त्वचा कोरडी होण्याची समस्या होऊ शकते. म्हणून अंग पुसताना टॉवेल अंगावर रगडू नये, हळूच अंग पुसावे. साबणाऐवजी फोमिंग जेलचा वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. या साध्या-साध्या गोष्टी आहेत, ज्या आंघोळ करताना केल्या जातात. ज्या चुकीच्या आणि हानिकारक आहेत. म्हणून अशा चुका टाळायलाच हव्यात.
आंघोळ जेवणानंतर का जेवणाआधी?
जेवल्यानंतर आपल्या शरीराचे तापमान २ अंशांनी वाढते. यामुळे पचन होण्यास मदत होते. पचनक्रिया सुरू असताना रक्ताभिसरणही चांगले होत असते. आयुर्वेदानुसार जेवणानंतर आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळू शकत नाही. परिणामी शरीरात अनेक समस्या उद्भवतात. याउलट, आंघोळीनंतर जेवल्याने पोटभर जेवले जाते. जेवल्यानंतर २ ते ३ तास आंघोळ करू नये. तसेच नाश्ता केल्यानंतर १ तास आंघोळ करू नये. थोडक्यात काय तर, जेवणाच्या दोन तास आधी आंघोळ करावी किंवा जेवल्यानंतर २ तासांनी आंघोळ करावी.
प्रभावी व्यक्तिमत्वासाठी...
कामाच्या ठिकाणी आपण कसे वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक समस्या कधीही शेअर करू नका. हि खुप वाईट सवय असून हे अव्यावसायिकपणाचे लक्षण मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी अत्यंत वक्तशीर असते तेव्हा त्याचे व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रशंसनीय असते. म्हणून शक्यतो कामाच्या ठिकाणी वेळेआधीच पोहचावे. उद्धटपणे वागण्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परीणाम पडू शकतो. आपण नम्र आणि ग्राउंड लेव्हलला असणे आवश्यक आहे. ॲक्टिव्ह टीम सहकारी असणे हे एक अतिशय आवश्यक कौशल्य आहे. टीमसोबत जुळवून घेऊन काम करणे, हे सकारात्मक व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाते. ऑफिसच्या डेस्कवर स्वच्छता राखायला हवी. ही डेस्कवरची स्वच्छता आपल्या कामावर अधिक प्रभाव टाकते.
आपले उत्पन्न वाढवा!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा