आला पावसाळा तब्येत सांभाळा
ऋतू हिरवा, ऋतू बरवा,
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर,
सरसरतो मधूशिरवा
गितकार शांता शेळके यांच्या या गितात अक्षरश: शब्दरुपी पाऊसच अनुभवता येतो. पाऊस जणू धरणीमातेला हिरव्या शालूची भेट देतो. सर्वदूर हिरवळच हिरवळ पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. अधून मधून हा पाऊस अक्षरश: उन्हालाही भिजवतो. निळे आकाश सुगंधीत करतो. हाच पाऊस प्रेमाचाही साक्षीदार होतो. इंद्रधनुष्याची निर्मिती पावसामुळेच..! हा इंद्रधनुष्य आकाश आणि धरतीची भेट घडवून देतो. हे सर्व सौदर्य पाहण्यासाठी डोळे आसुसलेले असतात. निसर्ग सौंदर्याचा मोह काही केल्या आवरत नाही..! मात्र या मोहात तल्लीन होताना तब्येत सांभाळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
अल्हाददायक वाटणारा आणि मन प्रसन्न करणारा हा पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना निमंत्रण देणाराही असतो. हे विसरता कामा नये..! पावसाचा आनंद तर घ्यायलाच हवाच, मात्र तेवढीच आरोग्याची काळजीही घ्यायला हवी. पावसाळ्यात व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेकदा डासांच्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. उघडयावरचे अन्न, हवा, दूषित पाणी यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते. पावसाळ्यात नेमके कोणते आजार होतात आणि ते आजार दूर ठेवण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
चिकुनगुनिया : हा विषाणू एडीस जातीच्या डासांद्वारे हाेतो. हे डास स्वच्छ पाण्यावर असतात. यात दोन-तीन दिवस ताप आणि डोकं दुखते, पाठ, पोट, कंबर या भागांवर पुरळ उठतात. हातापायांचे सांधे तीव्र प्रमाणात दुखतात. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून सूज येऊन त्रास होतो. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हा त्रास जाणवतो.
मलेरिया : हा आजार अॅनोफेलस जातीच्या डासांच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्यात, डबक्यात या डासांची उत्पत्ती होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजणे आणि घाम येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
डेंग्यू : पहाटे तसेच सकाळच्या वेळी हे डास सक्रिय असतात. हे डास चावल्याने डोकेदुखी, ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना होतात. पहिल्या लक्षणांमध्ये ताप आणि थकवा यांचा समावेश असतो. डेंग्यू तापात विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.
वरील आजार डासांमुळे होतात तर काही आजार दुषित पाण्यामुळेही होतात. याशिवाय हवेतील विषाणुंमुळेही काही आजार होतात याबद्दल जाणून घेऊया.
टायफाइड : हा दुषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टायफॉइड तापाची चाचणी करण्यासाठी टायफाइड टायफी आयजीएम आणि विडल एग्लूटिनेशन या चाचण्या कराव्या लागतात.
लेप्टोस्पायरोसिस : त्वचेवर कुठे चिरलेले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांच्या माध्यमातून शरीरात प्राण्यांचे मूत्रमिश्रीत असलेले पाणी गेले तर हा भयानक आजार होऊ शकतो. डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि फुफ्फुसात रक्तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.
हिपेटायटीस : विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. यात पेंशटचे डोळे आणि त्वचा पिवळी होते तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्तपणा जाणवतो.
व्हायरल फिव्हर : यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना अशी लक्षणे दिसून येतात. याचबरोबर सामान्य फ्लू, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणेही विषाणूंपासून होणाऱ्या आजारांची असतात. ही लक्षणे बहुतेकदा कमी अधिक प्रमाणाता आढळून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते.
अशी घ्या काळजी : खोकताना किंवा शिंकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल ठेवावा. उकळून थंड केलेले पाणी प्यावे. लहान मुलांना संसर्ग संक्रमित व्यक्तींपासून दूर ठेवावे आणि घरात स्वच्छता राखावी. प्रत्येक खोलीत हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करावा. सतत हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न असावा. संतुलित आहारातून रोगप्रतिकारकता वाढविण्याचा सतत प्रयत्न असायला हवा. बुरशीजन्य आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी सदैव वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


छान लेख आहे... आजारी पडण्यापेक्षा तब्येतीची काळजी घेणे केव्हाही चांगले... अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आजार कसे होतात हे लेखकांनी समजावलेले आहेत. शिवाय लेखाच्या शेवटी अगदी मोजक्यात शब्दात काळजी कशी घेता येईल याचेही मार्गदर्शन केले आहे... ब्लॉग खूपच मार्गदर्शक आहे... ब्लॉग व लेखकांचे शतश: आभार आणि शुभेच्छा..!
उत्तर द्याहटवा