अस्वस्थ करणारी खाज
उत्तम आरोग्य यश प्राप्तीसाठी खूपच गरजेचे आहे. छोट्या छोट्या वाटणाऱ्या शारीरिक समस्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. त्यातलीच खाज ही एक अस्वस्थ करणारी समस्या आहे. यावर वेळीच उपाय करणे गरजचे असते. चुकीची जीवनशैली या आजाराला कारणीभूत असू शकते. चला तर खाजेविषयी सविस्तर जाणून घेऊया. खाजेचे कारण आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी यावरही चर्चा करूया.
त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. खाज ही एका सूक्ष्म विषाणूंचा (मायक्रोब) परिणाम आहे. खाज जर वारंवार येत असेल तर ते मूत्रपिंड किंवा यकृताचे दुखणेही असू शकते. स्किन इचिंगची समस्या बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळेही उद्भवते. अंघोळ न करणे, त्वचेवर धूळ-माती जमणे अशा कारणांमुळेही खाजेची समस्या उद्भवते. शरीराला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा रुक्ष होऊन खाजेची समस्या सुरू होते. रक्तसंक्रमणामुळेही फोड आणि पुरळ येऊन खाज येते.
पुरळ नसलेली खाज हा एक प्रकार असून, या प्रकारच्या खाजेमुळे अन्य लक्षणे दिसून येतात. या प्रकारची खाज संपूर्ण त्वचेवर किंवा डोके, चेहरा, पाय, बोटे, नाक, हात किंवा जननांगाजवळ होते. ही खाज कोरडी किंवा ओलीही असते. शुष्क त्वचा असल्यास खाजेची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींना अनुकूल तापमान नसल्यास लगेच खाज सुरू होते. उन्हाळ्यात अधिक तापमान वाढल्याने घाम येतो. बाहेरून घरी आल्यावर संपूर्ण शरीर घामाने निथळत असते. परंतु पंखा, एसी, कूलरमुळे घाम अंगावरच वाळतो आणि खाज सुरू होते. थंडीत त्वचा रुक्ष होऊन फुटते आणि खाज सुरू होते, तर उन्हाळ्यात घामोळे येऊन खाज सुरू होते.
अनेकदा त्वचेच्या आजारांमुळे खाजेची समस्या उद्भवते. उदाहरणार्थ, डर्माटायटिसमध्ये त्वचेला सूज येऊन खाज येते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचाविकारात त्वचा लाल होते व त्वचेचा दाह होतो. चिकनपॉक्स, खसरा, उवा, पाइनवर्म अशा अनेक जंतूसंसर्गामुळे खाज उद्भवते. डोक्यात उवा झाल्यानेही खाज होते. तापमान अधिक असेल तरी खाज येते. सुरुवातीला खाजेचे प्रमाण कमी असते. परंतु जोराने खाजविल्याने त्वचा लाल होते. त्वचेवर पुरळ उठते. कंबर, छाती, बगल, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते.
अशी घ्या काळजी : त्वचा आर्द्र राखण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. खाण्याचा सोडा खाजेची समस्या कमी करतो. अंघोळीच्या पाण्यात खाण्याचा सोडा वापरता येईल. अँटी इचिंग क्रीमचा वापर करावा. रक्तसंसर्गामुळे खाज येते असल्यास कडुलिंबाची पाच ते सहा पाने रोज चावून खावीत. कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने स्नान केल्यास खाज कमी होते. खोबरेल तेलात कापूर मिसळून मालिश केल्यास फरक पडतो. कडुलिंबाच्या झाडावरच पिकलेल्या लिंबोळ्या खाल्ल्यानेही फायदा होतो. सकाळ-संध्याकाळी जेवणात टोमॅटो असावा. फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. खाज आल्यास जास्त खाजवू, ओचकारू नये. साबण, डिटर्जंट आणि परफ्यूमपासून दूरच राहावे. हिवाळ्यात स्नानापूर्वी तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मालिश करावी. शुष्क त्वचा असेल तर आंघोळी नंतर आणि झोपण्याआधी खोबरेल तेलाने मालिश करावी. अशुद्ध रक्तामुळे खाज येत असेल तर हा आजार बळावण्यापूर्वीच खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. मीठ कमी खावे. आजार वाढल्यास मीठ पूर्ण बंद करावे. तसेच चिंच, लोणचे, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहाही वर्ज्य करावा. खोबरेल तेलात लिंबू पिळून मालीश केल्यासही खाज कमी होते.
- कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा