भगवत गीता : 5 श्लोक 1-10

अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग

श्लोक १

अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां
कृष्ण पुनर्योगं च शंससि।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे
ब्रूहि सुनिश्चितम्‌॥

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता! तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा. 

श्लोक २

श्रीभगवानुवाच संन्यासः
कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो
विशिष्यते॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. 

श्लोक ३

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि
न काङ्क्षति । निर्द्वन्द्वो हि महाबाहो
सुखं बन्धात्प्रमुच्यते॥

हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो. 

श्लोक ४

सांख्ययोगौ पृथग्बालाः
प्रवदन्ति न पण्डिताः।
एकमप्यास्थितः
सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌॥

वर सांगितलेले संन्यास आणि कर्म योग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पंडित नव्हेत. कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. 

श्लोक ५

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति॥

ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. 

श्लोक ६

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥

परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. 

श्लोक ७

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते॥

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो. 

श्लोक ८, ९

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ । पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्‌॥प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌॥

सांख्यायोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही. 

श्लोक १०

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं
त्यक्त्वा करोति यः। लिप्यते न स
पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥

जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!