भगवत गीता : 14 : श्लोक 21-27
श्लोक २१
अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन्गुणानेतानतीतो
भवति प्रभो। किमाचारः कथं
चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते॥
अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? तसेच हे प्रभो (श्रीकृष्णा), मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?
श्लोक २२
श्रीभगवानुवाच प्रकाशं च
प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही
श्लोक २३
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते॥
जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही
श्लोक २४
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥
जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून दुःख-सुख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात
श्लोक २५
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते॥
जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.
श्लोक २६
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते॥
आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो.
श्लोक २७
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च॥
कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा