भगवत गीता : 15 : श्लोक 1-10
अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
श्लोक १
श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः
शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या, ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे.
श्लोक २
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके॥
त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्ययोनीत कर्मांनुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूपी मुळेही खाली व वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.
श्लोक ३
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो
न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं
सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा॥
या संसारवृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाळी आढळत नाही. कारण याचा आदी नाही, अंत नाही. तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासना रूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून
श्लोक ४
ततः पदं तत्परिमार्गितव्यं
यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः।
तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये
यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी॥
त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसारवृक्षाची प्रवृत्तिपरंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे.
श्लोक ५
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या
विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः
सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्॥
ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात.
श्लोक ६
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम॥
ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी; तेच माझे परमधाम आहे.
श्लोक ७
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति॥
या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.
श्लोक ८
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्॥
वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो.
श्लोक ९
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते॥
हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो.
श्लोक १०
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः॥
शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही (त्या आत्मस्वरूपाला) अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्त्वतः ओळखतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा