भगवत गीता : 18 : श्लोक 1-10
अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग
श्लोक 1
अर्जुन उवाच संन्यासस्य
महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन॥
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो.
श्लोक 2
श्रीभगवानुवाच काम्यानां कर्माणां
न्यासं संन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास मानतात. तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात.
श्लोक 3
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे॥
कित्येक विद्वान असे म्हणतात की, सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की, यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही.
श्लोक 4
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः॥
हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्त्विक, राजस व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे.
श्लोक 5
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्॥
यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत.
श्लोक 6
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्॥
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ही यज्ञ, दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे.
श्लोक 7
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः॥
(निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे.) परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे.
श्लोक 8
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्॥
जे काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. ॥ १८-८ ॥
श्लोक 9
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः॥
हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्त्विक त्याग मानला गेला आहे.
श्लोक 10
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः॥
जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मांत आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा