भगवत गीता : 18 : श्लोक 31-40
श्लोक 31
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय.
श्लोक 32
अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय.
श्लोक 33
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।
योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्त्विक होय.
श्लोक 34
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी॥
परंतु हे पार्था (अर्थात पृथापुत्रा) अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अती आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय.
श्लोक 35
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहातो, ती धारणा तामसी होय.
श्लोक 36, 37
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति॥
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्॥
हे भरतर्षभा (अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक म्हटले गेले आहे.
श्लोक 38
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्॥
जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.
श्लोक 39
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्॥
जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.
श्लोक 40
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः॥
पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की, जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा